तालुका प्रतिनिधी विजय अहिरे

दत्तजयंतीचे औचित्य साधून समाजसेवक, दानशूर व्यक्तिमत्व गणू महाराज यांनी म्हसदी गावातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करून एक स्तुत्य उपक्रम राबविला.आजच्या धावपळीच्या काळात माणुसकी समजणारी आणि कृतज्ञतेची भावना जोपासणारी अशी कृतिशील भूमिका महाराज सातत्याने निभावत असतात.
गाव स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, अशा स्वच्छता कर्मचाऱ्यांचे समाजात अनेकदा दुर्लक्ष होताना दिसते. परंतु गणू महाराज यांनी “आपण सर्व त्यांच्या सेवांचे देणे लागतो” या भावनेतून या कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव केला.
सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना ड्रेस, साडी, शाल, नारळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महाराज म्हणाले की,“स्वच्छता ही फक्त मोहीम नाही तर संस्कार आहे. ह्याच संस्काराचे वाहक हे स्वच्छता कर्मचारी आहेत. त्यांचे मनापासून कौतुक केले पाहिजे.”या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला महाराजांच्या या सामाजिक बांधिलकीच्या आणि मानवतेच्या कार्याला मनःपूर्वक सलाम!अशाच उपक्रमामुळे समाजात आपुलकी, आदर आणि कृतज्ञतेची भावना दृढ होत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



