बल्लारपूर (ता. ७ जुलै २०२५, सोमवार) – बल्लारपूर शहरातील नागरिकांना गढूळ आणि अशुद्ध पाणीपुरवठा तसेच अवास्तव बिल आकारणी यामुळे त्रस्त करून सोडणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी बल्लारपूर शहर यांच्या वतीने “आक्रोश मोर्चा”चे आयोजन करण्यात आले आहे.

मागील सहा महिन्यांपासून वेळोवेळी निवेदने देऊन आणि निदर्शने करून देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारणा केल्या नाहीत. उलट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.या पार्श्वभूमीवर ७ जुलै रोजी प्राधिकरण कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात येणार असून, शहराध्यक्ष उमेश जनार्दन कडू यांनी सर्व नळ ग्राहकांना आवाहन केले आहे की, मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्या नळपाण्याच्या बिलाची झेरॉक्स प्रत व आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत आणून वंचितच्या प्रतिनिधीकडे जमा करावी.महिला आघाडी शहराध्यक्षा रेखाताई पागडे यांनीही महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले असून, हा मोर्चा प्राधिकरणाच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांच्या एकजुटीचे प्रतीक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.ही माहिती वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहराचे महासचिव गौतम रामटेके यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी : डॉ . बाळासाहेब बनसोडे



