प्रकाशपर्व न्युज पोर्टल – धम्मपाल शिंदे पुणे व लातूर जिल्हा पुणे
शहरात सध्या गुंडगिरी, टोळीयुद्ध आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बंडू आंदेकर आणि निलेश घायवळ टोळीने पुण्यात दहशत माजवली असताना आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील वाहनांची तोडफोड, कोयत्याचा वापर करून होणारे हल्ले आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
संशयास्पद वाहनांची कसून तपासणीपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरभर नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या विशेष मोहिमेत गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, राज्य राखीव पोलीस बल आणि पोलीस मुख्यालयातील विशेष पथके सहभागी होणार आहेत. शहरातील गुंड टोळ्यांकडून चोरीच्या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने, अशा संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विशेषतः, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.



