
प्रकाशपर्व जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
बर्डी (ता. जालना) — बर्डी गावात “बुद्ध आणि त्यांचा धम्म”या ग्रंथाच्या सांगता समारंभाचा आणि अश्विन पौर्णिमा उत्सवाचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने गावात बौद्ध अनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पूजनीय भिक्खू बुद्ध धम्मपाल उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रभावी धम्मदेशनेत तथागत भगवान बुद्धांचे करुणामय जीवन, सम्यक विचार आणि समाज परिवर्तनासाठी दिलेला धम्ममार्ग यावर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी सर्वांना धम्माचे अध्ययन, आचरण आणि प्रसार करण्याचे आवाहन केले.

ग्रंथवाचनाचे कार्य अरुणाताई विजय गंगातीवरे यांनी मनोभावे पूर्ण केले. त्यांच्या उत्कृष्ट ग्रंथवाचनाबद्दल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना “बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी गयाबाई माघाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाचा दाखला देत समाजासमोर प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी बौद्ध धम्माच्या माध्यमातून सामाजिक एकता, समानता आणि बंधुत्वाचा संदेश दिला.

कार्यक्रमास परिसरातील शिवराम लहाने,चोखराम लहाने, तानाजी म्हस्के, मदन रंधवे, यशवंत रंधवे, राहुल सदावर्ते, न्यानेश्वर मोरे,मधुकर म्हस्के, दादाराव बोरुडे, मिलिंद माघाडे, सोमाजी लहाने, विष्णू रौंदळे, सनेश रंधवे, बाबुराव म्हस्के, हरिभाऊ लहाने, प्रकाश शिंदे, विलास दांडेकर, भास्कर गाडेकर, रंगनाथ जाधव, संगीता मोरे,रमाबाई शिंदे,सुनीता लहाने, कमल शिंदे,व गावातील , उपासक उपासिका, युवक व युवती यांच्यासह बौद्ध अनुयायांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन शिलेदार तरुण मित्र मंडळ,व बौध्द पंच कमिटी बर्डी यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कुशलतेने करण्यात आले तर शेवटी सूत्रसंचालकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून समारोप केला






