जालना प्रतिनिधी रामकिसन अवधूत

कवडगाव, दि. १७ सप्टेंबर – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कवडगाव ते पावसे पांगरी या दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांना अंबडकडे जाण्यासाठी झिरपी मार्गे मोठा वळसा घालावा लागत आहे. हा पूल जवळचा आणि सोयीस्कर असल्याने नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असे
वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा. आप्पा झाकणे यांनी सांगितले की, “या पुलाचे काम अवघ्या वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले होते. मात्र यंदाच्या जोरदार पावसात पूल कोसळला, यावरून कामात निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याचे स्पष्ट होते.”
गावकऱ्यांनीही पुलाच्या बांधकामाबाबत गंभीर आरोप केले आहेत. “निकृष्ट साहित्य वापरल्यानेच पूल एका वर्षात कोसळला. जबाबदार ठेकेदार व विभागीय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

दरम्यान, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने शाळकरी मुले, रुग्ण व कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.



