औरंगाबाद – देशात दिवसेंदिवस शिक्षण, बेरोजगारी, गरिबी आणि अन्याय-अत्याचाराच्या समस्या गंभीर होत असताना, या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी सरकार केवळ धर्म आणि जातिवादावर आधारित राजकारण करत आहे. जनतेच्या ज्वलंत समस्या दुर्लक्षित करून समाजात तेढ निर्माण करणारे मुद्दे उकरून राजकीय पोळी भाजली जात आहे.

सध्या देशात लाखो युवक शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोझर चालवले जात आहेत. महिलांवर अत्याचाराची प्रकरणं वाढत आहेत. पण या प्रश्नांवर उपाययोजना करण्याऐवजी, सत्ताधाऱ्यांचं लक्ष धर्म, देव, मंदिर-मशिदींच्या वादांकडे केंद्रित आहे. समाजाला विभागून सत्तेची खुर्ची सुरक्षित ठेवण्याचा हा डाव असल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.

सामान्य जनता म्हणते, “आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हवा आहे. पण सरकार आम्हाला धर्म-जातीचे जाळे देत आहे.” देशाच्या प्रगतीसाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असताना, सत्ताधारी वर्ग केवळ धार्मिक भावना भडकवून राजकीय फायदा घेत आहेत.
हा देश सर्वांचा आहे! – अशा वेळी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक समतेसाठी आवाज उठवला पाहिजे. शिक्षण, रोजगार, आरोग्य, आणि अन्यायाविरोधात लढणं हीच खरी देशभक्ती ठरते.
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी – रितेश नामदेव साबळे .



