नांदेड प्रतिनिधी – प्रकाश गवारे
श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ येथे भ्रष्टाचार विरोधातील जनआंदोलने उफाळून आलेली आहेत. त्या देशातील नेत्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. भारतातील सर्व स्तरावरील राजकीय नेत्यांनी – मग ते सरपंच असोत की खासदार, आमदार किंवा पंतप्रधान – या घटनांतून बोध घेणे आवश्यक आहे.
“शिशुपालाचे शंभर अपराध भरतातच… शिक्षा मिळणारच,” या म्हणीप्रमाणे भ्रष्ट नेत्यांची कृत्ये आता जनतेपासून लपून राहणारी नाहीत. सोशल मीडियाच्या युगात बलात्कार, भ्रष्टाचार, गुंडगिरी, घराणेशाही, कामचुकारपणा करणारे नेते, अधिकारी किंवा कर्मचारी लपून सुटू शकत नाहीत.

आज जनता भडकली, तर आंदोलक पूर्वीप्रमाणे सार्वजनिक बस, दुकाने, सरकारी संपत्तीचे नुकसान न करता थेट भ्रष्ट नेत्यांच्या मालकीच्या मालमत्तांकडे वळतील – प्रॉपर्टी, कारखाने, बँका, शाळा- कॉलेज, बंगले, ऑफिस, हॉटेल यांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा सामाजिक पातळीवर दिला जात आहे.
भारतामधील भ्रष्टाचारी लोकांना आश्रय देणारा देश मिळणे मुश्किल आहे. त्यामुळे वेळेवर सुधारा, लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, अशी जनतेची चेतावणी आहे.

आजही निकृष्ट रस्ते, पूल, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था यामध्ये भ्रष्टाचार चालूच आहे. ठेकेदार मालामाल होत आहेत, तर सामान्य नागरिकांना वीज, पाणी, आरोग्य, न्याय या मूलभूत सोयींसाठी भटकावे लागत आहे. अगदी न्यायालयीन व्यवस्था किंवा हॉस्पिटल व्यवस्थेतही भ्रष्टाचार दिसून येतो.
“साधा सरपंच एका वर्षात दारात स्कॉर्पिओ उभी करतो, हे लोकांना न दिसणं अशक्य आहे. जनता आता अनभिज्ञ किंवा अनपढ राहिलेली नाही,” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
पद वारसाहक्काने मुलगा, मुलगी, जावई, मेहुणा यांच्याकडेच द्यायचा अट्टाहास सोडावा, असा सल्लाही दिला जातो. कारण लोकशाहीला हे घराणेशाहीचे जाळे घातक ठरत आहे.
👉 भारताला इतर देशाच्या मार्गाने जायला लागू नये, म्हणून नेत्यांनी पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त शासन चालवावे, सोशल मीडियाची ताकद ओळखावी आणि लोकांचा विश्वास परत जिंकावा.
“खरेच पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त भारत होवो,” अशी जनतेची प्रार्थना आहे.

प्रकाशपर्व न्युज – नांदेड जिल्हा प्रतिनिधी, प्रकाश गवारे



