📍 बदलापूर – (विजय धों. गायकवाड) |
प्रतिनिधी -प्रकाशपर्व न्यूज
अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील चिखलोली या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची भव्य कमान (प्रवेशद्वार) उभारण्यात यावी, यासाठी वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर यांच्या वतीने आमदार डॉ. बाळाजी किनीकर यांना औपचारिक पत्र देण्यात आले आहे.
२५ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या या निवेदनात, वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष दिलीप सोनकांबळे यांनी मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीवर लक्ष वेधून, स्थानिक जनतेच्या भावना विचारात घेऊन लवकरात लवकर काम सुरू करण्याची विनंती केली आहे.
या मागणीची सकारात्मक दखल घेत आमदार डॉ. बाळाजी किनीकर यांनी ९ जून २०२५ रोजी अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून, लोकांच्या भावना लक्षात घेऊन डॉ. आंबेडकर यांच्या नावाने भव्य प्रवेशद्वार उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
ही कामगिरी पूर्णत्वास गेल्यास चिखलोली परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण कायम राहील, असे जनतेकडून सांगण्यात येत आहे.