दि. १६ जून २०२५
कंधार (ता. कंधार) –कंधार तालुक्यातील तळ्याचीवाडी येथे आज, दिनांक १६ जून २०२५ रोजी सकाळी एक भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली असून या आगीत लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.

ही आग गोविंद भानुदास गर्जे (रा. तळ्याचीवाडी) यांच्या राहत्या घरात शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे घरातील कपडे, कपाट, कुलर, फ्रिज, गाद्या व इतर संसारीक वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या. इतकेच नव्हे तर घरात ठेवलेली रु. ९५,०००/- रोख रक्कम देखील आगीत जळून गेली आहे.

आगीच्या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून परिसरात धुराळा पसरला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शेकापूर सज्जाचे महसूल अधिकारी, तलाठी श्री. योगेश गौड, पंचायत समितीचे अधिकारी केंद्रे, व ग्रामविकास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

नुकसानग्रस्त कुटुंबाला शासन दरबारी योग्य ती आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
पंचनाम्याच्या वेळी गावचे सरपंच प्रभाकर केंद्रे, माजी सरपंच बाळासाहेब गर्जे, गावचे पोलीस पाटील तसेच अनेक गावकरी नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. सर्वांनी मिळून गर्जे कुटुंबाला मानसिक आधार दिला.
ही घटना शासन व स्थानिक प्रशासनासाठी एक जागरूकतेचा इशारा आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांचे देखभाल-दुरुस्ती वेळेवर करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

✍️ बालाजी सुनील गायकवाडकंधार /कंधार तालुका प्रतिनिधी