रामकिसन अवधूत / प्रकाशपर्व न्यूज अंबड तालुका
सुखापूरी गावातील नदीवर सध्या सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे पुलाच्या स्थैर्याबाबत आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून शासनाच्या निधीतून कोट्यवधी रुपयांची तरतूद करून हा पूल उभारण्याचे काम सुरू आहे. हा पूल भविष्यात परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, प्रत्यक्ष बांधकामात वापरण्यात येणारे सिमेंट, वाळू व लोखंड निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यात सिमेंट मिक्स करून काम केलं जातं, तर लोखंडाला आवश्यक ती जाडी किंवा मजबुती दिसून येत नाही, असे आरोपही ग्रामस्थांकडून झाले आहेत.

पुलाच्या कामावर कोणतीही ठोस देखरेख करणारी यंत्रणा नसल्याने ठेकेदार मनमानी करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विभागीय अभियंता किंवा अधिकारी नियमितपणे येत नसल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गावकऱ्यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

या संदर्भात गावातील ज्येष्ठ नागरिक नामदेवराव पाटील म्हणाले, “हा पूल हजारो लोकांच्या दैनंदिन वापरासाठी असून त्याची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. जर कामच चुकीच्या पद्धतीने, निकृष्ट साहित्य वापरून केले जात असेल, तर भविष्यात कोणताही मोठा अपघात घडू शकतो.”

या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित यंत्रणेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच, कामाची गुणवत्ता सुनिश्चित होईपर्यंत काम थांबवण्यात यावे आणि नव्याने मान्यताप्राप्त यंत्रणेद्वारे गुणवत्ता चाचणी घेण्यात यावी, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे.



