डॉ. बाळासाहेब बन्सोडचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील गडपिपरी गट ग्राम पंचायतच्या निष्काळजी कारभारामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. गडपिपरी येथील रहिवासी मिलिंद काशीनाथ पाटील यांच्या घरगुती नळाद्वारे येणाऱ्या पिण्याच्या पाण्यात नारू आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दि. 24 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता पाणी भरून झाल्यावर शेवटच्या बादलीत हा नारू दिसून आला.
ग्रामपंचायत प्रशासनाकडून उडवाउडवी
घटनेची माहिती तत्काळ गडपिपरी गट ग्राम पंचायतचे सरपंच चंदुलाल पाटील, उपसरपंच सौ. कल्पना हरडे, ग्रामसेवक निलेश रामटेके व सदस्य योगेश करावे यांना देण्यात आली. मात्र संबंधित पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी टाळत उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पाच वर्षांपासून सुरुच आहे समस्या

गडपिपरी गावात ही पहिलीच घटना नाही. गेल्या पाच वर्षांपासून वारंवार पाण्यात नारू, गाळ व घाण आढळत असून ग्रामपंचायत प्रशासनाने कधीही गांभीर्याने दखल घेतलेली नाही. नियमित पाण्याच्या टाकीची साफसफाई होत नसल्याने अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून पोटाचे विकार, त्वचारोग व पोटदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाकडे तक्रार
या गंभीर प्रकाराची माहिती मा. संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती चिमूर यांना देण्यात आली आहे. आता या प्रकरणावर कोणती ठोस कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाने त्वरीत चौकशी करून जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच पाण्याच्या टाक्यांची नियमित साफसफाई करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.
या घटनेने गडपिपरी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला असून निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याशी होत असलेला खेळ थांबवण्यासाठी नागरिक एकजूट होण्याची वेळ आल्याचे स्पष्ट होत आहे.




