कंधार प्रतिनिधी – बालाजी सु. गायकवाड
कंधार तालुक्यातील गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आली असून, घरकूल योजनेसाठी आवश्यक असलेल्या सेल्फ सर्वे (स्वयं सर्वेक्षण) करण्याची मुदत १८ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी ही माहिती देताना सर्व गरजू नागरिकांनी या अंतिम मुदतीत आपले सर्वे पूर्ण करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या योजनेचा उद्देश विटकामगार, ऊसतोड मजूर, रोजंदारीवर काम करणारे मजूर, तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांना निवासाची सोय करून देणे आहे. अनेक कुटुंबे आजही निवाऱ्याविना कष्टमय जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांना शासनाच्या या घरकूल योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

अनेक पात्र लाभार्थी आजही योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांनी ही संधी गमावू नये आणि आपली माहिती तात्काळ नोंदवावी, असे स्पष्ट आवाहन गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे. या सर्वेच्या आधारेच पुढील शासकीय प्रक्रिया केली जाणार असल्यामुळे, पात्रतेच्या आधारे लाभ निश्चित केला जाईल.

घरकूल योजनेसाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी गरजूंना घरासाठी अनुदान स्वरूपात दिला जातो. त्यामुळे पात्र नागरिकांनी ही संधी हातची जाऊ देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
घरकूल योजनेसाठी इच्छुक नागरिकांना संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधून किंवा पंचायत समिती कार्यालयामार्फत मिळणाऱ्या मार्गदर्शनाने आपला स्वयं सर्वे लवकरात लवकर पूर्ण करावा लागेल. मोबाइल अॅप किंवा पोर्टलवरही ही सुविधा उपलब्ध आहे.