श्रीरामपूर (प्रतिनिधी – सुनिल वाघमारे)
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील धार्मिक संस्थेत काम करणाऱ्या शेकडो कामगारांना धर्माच्या आधारे नोकरीवरून काढण्यात आल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीरामपूर तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सांगण्यात आले की, नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे गेल्या अनेक वर्षांपासून विविध जाती-धर्मांतील लोक एकोप्याने काम करत होते. सर्वधर्म समभाव आणि सलोख्याची भावना जपत ही मंडळी आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेची साधने करत होती. मात्र अलीकडे काही समाजकंटकांच्या दबावामुळे मुस्लिम व इतर मागासवर्गीय कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता, केवळ त्यांच्या धर्मामुळे कामावरून कमी करण्यात आले.

हा निर्णय भारतीय राज्यघटनेतील कलम १४, १५ आणि १६ च्या सरळसरळ उल्लंघन करणारा आहे. शिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाने धर्माच्या आधारे नोकरीवरून काढलेले कामगार हे अन्यायग्रस्त आहेत आणि यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, असे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.
या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे की:
संबंधित कामगारांना त्वरित पुन्हा कामावर घेण्यात यावे,
धर्माच्या नावावर चुकीचे निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर आणि शिस्तभंग कारवाई करण्यात यावी,
संविधानविरोधी मागण्या करणाऱ्यांवर देखील कारवाईची प्रक्रिया हाती घेतली जावी.

निवेदन देताना उपस्थित मान्यवर:
या निवेदनाचे नेतृत्व जिल्हा महासचिव सुनिलभाऊ वाघमारे व जिल्हाध्यक्ष प्रवीणभाऊ आल्हाट यांनी केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सुगंधराव इंगळे, डॉ. सलीम शेख, दत्तनगर ग्रा.पं. सदस्य विशाल पठारे, ॲड. अमोल सोनवणे, संतोष त्रिभुवन, गुलजार खान सरदार, जहांगीरखान, शाहिद बागवान, ॲड. अण्णासाहेब मोहन, डॉ. चंद्रसेन भडांगे, बाळाभाऊ गायकवाड, सम्यक विद्यार्थी आंदोलन जि. अध्यक्ष ओम त्रिभुवन, उसामा शेख (जि. संघटक), मस्जिद शेख (ता. संघटक), अन्वर खान, सलिम शेख, बाळासाहेब खरात, योगेश घोडके, राहुल गायकवाड, तेजस कटारनवरे आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रचार प्रमुख विलास अहिरे यांनी केले. संपूर्ण उपक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन यूथ आघाडी, व सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.



